उधमपूर : ‘काश्मीरच्या युवकांना पर्यटन हवे की दहशतवाद? काश्मीरमध्ये काही तरुण दगडफेक करत आहेत, तर काही तरुण दगड फोडून पायाभूत सुविधा भक्कम करण्याचे काम करत आहेत. तुम्हाला नवनिर्माण करायचे आहे, की अशांतता निर्माण करायची आहे याचा निर्णय तुम्हीच घ्यावा. राज्याचा विकास आणि समृद्धीसाठी दहशतवादापेक्षा पर्यटनाचा पर्याय निवडा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
काश्मीरमध्ये मोदी यांनी रविवारी (दोन एप्रिल) भारतातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील नाशरी ते चेनानी या मार्गावर हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी झाले आहे. हा बोगदा सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा बोगदा तयार करण्यात आला आहे. ९.२८ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे जम्मू- श्रीनगर या प्रवासातील वेळ दोन तासांनी वाचणार आहे. अंतर घटल्याने मोठ्या प्रमाणावर इंधनबचतही होणार आहे.
‘गेल्या चाळीस वर्षांमध्ये काश्मीरमध्ये केवळ हिंसाचारच झाला. हिंसाचाराऐवजी या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाबद्दल बोलले गेले असते आणि काश्मीरच्या जनतेने ४० वर्षे पर्यटन विकासात खर्ची घातली असती, तर काश्मीर अव्वल दर्जाचे पर्यटनस्थळ झाले असते,’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. हिंसेने कुणाचेही भले होणार नाही, हिंसेने सर्वाधिक नुकसान जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचेच झाले असल्याचेही ते म्हणाले.
‘सीमेपलीकडच्या पाकिस्तानला आपलाच देश सांभाळता येत नाही,’ असा टोला लगावून, ‘भारताचा भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने काश्मीर खोऱ्याचा विकास बघावा आणि त्यांचा भूभाग बळकावणाऱ्यांनी किती नुकसान केले याचा विचार करावा. पाकिस्तान स्वतःचीही काळजी घेऊ शकत नाही,’ असेही पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावले.
‘या बोगद्यामुळे व्यापाराला, पर्यटनाला चालना मिळणार आहेच; पण प्रत्यक्ष अंतर कमी झाल्याने काश्मीरमधील लोकांच्या मनातील दुरावाही कमी होईल,’ असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.